कष्टकरी जगण्याचे काव्यरूप : ‘येता जाता’

co so

राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन, मुर्तीजापूर येथे २२ मार्च रोजी कवी कैलास श्रीराम सोळंके यांचा “येता जाता” हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांचे जगणे, समाजातील विसंगती आणि मानवी भावनांचे विविध पैलू यांचे साध्या, थेट आणि प्रभावी शब्दांत चित्रण या संग्रहात आढळते. जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या विविध अनुभवांना कवीने संवेदनशीलतेने शब्दबद्ध केले असून मातीचा सुगंध, माणुसकीची जाणीव आणि सामाजिक भान या कवितांमधून प्रकर्षाने जाणवते.


या काव्यसंग्रहाला प्रख्यात साहित्य अभ्यासक डॉ. श्रीकांत तिडके तथा उर्दू भाषा समिती (बालभारती, पुणे) चे सदस्य डॉ. नासिरोददीन अन्सार यांची अभ्यासपूर्ण व विचारसमृद्ध प्रस्तावना लाभली आहे; तसेच निसर्गकवी रविंद्र जवादे यांची जिव्हाळ्याची पाठराखणही या काव्यप्रयत्नामागे उभी आहे. या मान्यवरांच्या सहकार्यामुळे आणि प्रेरणेने हा कवितासंग्रह अधिक आशयगर्भ व अर्थपूर्ण ठरतो.
या कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीच्या लेखनविश्वाचा आणि त्यातील आशयवैविध्याचा परिचय वाचकांना करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
कैलास श्रीराम सोळंके यांचा “येता जाता” हा कवितासंग्रह माणुसकी, समाज आणि जीवनातील लहानमोठ्या घटनांचे गहिरे दर्शन घडवणारा आहे. कवितेतील शब्दप्रयोग आणि विचार यांच्या माध्यमातून कवी वाचकांना विचार करण्यास आणि समाजातील अनेक प्रश्नांवर पुन्हा चिंतन करण्यास प्रवृत्त करतो.
“येता जाता” हे शीर्षकच जीवनाच्या प्रवासाचे प्रतीक वाटते. जीवनाच्या वाटेवर भेटणारे विविध अनुभव, कष्टकरी माणसांचे संघर्ष आणि जगण्यातील साधे पण गहिरे सत्य यांचा शोध कवीने या संग्रहात घेतला आहे.
या संग्रहातील अनेक काव्यांश समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करतात. “लोहाराचा भाता लिहितो”, “शेतकऱ्याला पिता लिहितो” यांसारख्या ओळींमधून कवी सामान्य माणसाच्या श्रमांना मानाचा मुजरा करतो. तसेच “तुमचेच वाचत होतो आजवर, माझे तर आता आता लिहितो” या ओळींमधून कवीच्या लेखनप्रवासातील प्रामाणिकता जाणवते.
या काव्यसंग्रहात समाजातील विसंगतींवरही भाष्य केलेले आहे. गरीब, शेतकरी आणि श्रमजीवी वर्गाच्या आयुष्याचे वास्तव कवीने संवेदनशीलतेने मांडले आहे. सामाजिक असमानता, आर्थिक विषमता आणि माणसामाणसातील दुरावा यांचा सूक्ष्म वेध या कवितांमधून घेतलेला दिसतो.
“सैनिकाला भ्राता लिहितो”, “नांगर वखर औता लिहितो” अशा प्रतिमांमधून कवीने श्रमसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर “भेदभाव नाही समता लिहतो” या ओळीतून सामाजिक समतेची आकांक्षा व्यक्त होते.
या संग्रहातील “ओल”, “बाजार”, “डोळे मिटून”, “पुन्हा नव्याने”, “सांजवेळी”, “हसण्यासाठी” यांसारख्या कविता विविध भावविश्व उलगडतात. काही कवितांमध्ये अंतःकरणातील वेदना व्यक्त होतात, तर काही कवितांमधून समाजातील वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केले जाते. प्रत्येक कवितेतून एक विचार, एक अनुभव आणि एक संदेश वाचकांपर्यंत पोहोचतो.
कैलास सोळंके यांच्या या कवितांमध्ये जीवनाचे गोड-कडू अनुभव वास्तवतेने मांडलेले आहेत. साधी, थेट आणि प्रभावी भाषा ही या कवितांची विशेषता आहे. त्यामुळे या कविता वाचकांच्या मनाला भिडतात आणि विचार करण्यास भाग पाडतात.
संग्रहातील “मी तर येता जाता लिहितो” ही ओळ कवीच्या लेखनस्वभावाचे प्रतीक आहे. जगण्याच्या वाटेवर येणारे अनुभव, माणसांचे जगणे आणि समाजातील बदल यांना शब्द देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
पुस्तक परिचय
कवितासंग्रह : येता जाता
कवी : कैलास श्रीराम सोळंके, मुर्तीजापूर
प्रकाशक : मुक्ता पब्लिकेशन, अकोला
स्वागत मूल्य : रूपये १५०
समीक्षण -सागर बाबाराव लोडम, 9850471520

One thought on “कष्टकरी जगण्याचे काव्यरूप : ‘येता जाता’”

Leave a Reply to A WordPress Commenter Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *